मुंबई : ‘दलित, आदिवासी, ओबीसी यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना (ईबीसी) स्वतंत्र प्रवर्ग करून १० टक्के आरक्षण देणारा केंद्र सरकारचा निर्णय क्रांतिकारक ठरणारा आहे,’ अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
सवर्णांमधील आर्थिकदृष्ट्या मागासांना स्वतंत्र प्रवर्ग करून १० टक्के आरक्षण देणारा निर्णय घेऊन दलित सवर्ण यांच्यातील दरी मिटविण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलल्याबद्दल आठवले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.
आठवले म्हणाले, ‘देशभरातील ब्राह्मण, मराठा, जाट, राजपूत, गुज्जर, पटेल, लिंगायत आदी सवर्ण समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासांना आर्थिक निकषावर स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण देण्यात यावे; मात्र दलित, आदिवासी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीत चार वेळा केली होती. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट घेऊन ही मागणी केली होती. आज सात जानेवारीला झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपली मागणी मान्य झाली असून, आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना स्वतंत्र प्रवर्ग करून १० टक्के आरक्षण देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आपण या निर्णयाचे स्वागत करीत असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा अभिनंदनीय निर्णय घेतला आहे.’